संत, पंत, तंत काव्यविषयक लेखमाला (१४)

विठ्ठल कवी आणि चित्रकाव्यबंध

विठ्ठलाने अलंकार, वृत्तं आणि कथांनी कवितासुंदरी सजवली. त्याने चढवलेले आणखी एक काव्यलेणे म्हणजे चित्रकाव्य.
एखाद्या वस्तूची, विषयाची, आकृतीची मनात कल्पना करून त्या कल्पनेला अनुरूप अशी शब्दरचना करणे –विवक्षित 
वर्ण ठरावीक ठिकाणी आणणे आणि ती शब्दरचना चित्ररूपात रसिकांपुढे ठेवणे याला कृत्रिम काव्य समजलं जात असलं तरी विठ्ठलाची नवीन काही देण्यामागची धडपड थक्क करून जाते.
चित्रकाव्यबंधाचा अर्थ अगदी सोपा आहे; पण रचना अवघड आहे. बंधनात असलेलं काव्य ते बंधकाव्य. काव्यरचनेचं वृत्त, काही अक्षरांची होणारी नियमित आवृत्ती यांमुळे काव्याला सौंदर्य प्राप्त होतं. शब्दवेडा कवी विठ्ठल नवनवीन शब्दांची वृत्तबद्ध गुंफणच नव्हे तर चित्रणही करत असे. या भागात आपण विठ्ठलाचे काही चित्रकाव्यबंध पाहू या.
१)द्वादशदल कमलबंध – १२ पाकळ्यांची कमळाकृती. २१ अक्षरी मोठं वृत्त – स्रग्धरा.
चाल : ध्याये नित्य महेशम्/६८/१७

नाटोपे कृष्ण काळा, कुटिल अघमळा
कैं न लिंपे विटाळा
चोरीचा त्यासि चाळा, गवळणि अबळा
मोहिल्या चक्रचाळा
घाली मंदारमाळा अजगर बगळा
मारिला काग काळा
त्या नेदी राजबाळा कवण करि बळा त्कार पाहो नृपाळा?
चालीत म्हणताना लक्षात येईलच – दर सातवं अक्षर ‘ळा’ आहे. इथे बंधन आहे वृत्ताचं आणि अक्षरांचं. चालीत म्हणताना कधीकधी अक्षर तोडलंही जातंय – चवथ्या ओळीत कवण करि बळा… त्कार असा टवका उडाला आहे; पण हे बंधकाव्यात क्षम्य आहे.
विठ्ठलाला असा शब्दचातुर्याचा नाद होता आणि त्याने स्वतःसाठीच अवघड मानकं ठरवली.
‘च्छा’ हे जोडाक्षर स्रग्धरेतच कसं गुंफलं आहे बघा
…६८/१९
श्रीवत्साचे यदृच्छा पदक धरि उरीं वर्तताहे स्वइच्छा
सोंगें घे कूर्ममच्छादिक बहु कपटी राज्यभोगीं अनिच्छा
कंठीं मंदारगुच्छावळि मणि मुकुटीं वेष्टिता केकिपिच्छा
दुष्कर्में सर्व आच्छादुनि यश मिरवी हे जयाची चिकिच्छा
द्वादशकमल बंध का म्हणायचं? यति असलेल्या अक्षरावर एकच अक्षर १२ वेळा येत आहे.
यति असलेलं अक्षर मुख्य धरून त्याची प्रतिष्ठापना मध्यभागी करायची आणि बाकी ओळी १२ पाकळ्यांमध्ये लिहायच्या.

(चित्रं त्या-त्या ठिकाणी जोडली आहेत.)

२)असाच आठ पाकळ्यांच्या मांडणीत गुंफलेला पंचचामर वृत्तातील अष्टदल कमल बंध. ९२/३१

अनंग जाळिला भवें मग स्वभूसि वैभवें
सुतप्रदान शांभवें दिलें तया मनोभवें
शरासनीं स्वसंभवें क्षुरप्र योजिलें जवें
प्रपंचचामरा जवें विजीति दूत लाघवें
आठव्या अक्षरावर येणाऱ्या वे वर यति येत आहे. वे हे अक्षर मध्यभागी ठेवून याचाही सुंदर चित्रबंध रेखाटला आहे.

३)पट्टिश बंध. पट्टिश हे पट्ट्यासारखं जुनं अस्त्र आहे. ८५/२७

कृष्णाची थोर सेना पसरली गगनासारिखी पाहवेना
पृथ्वीछाया दिसेना दशशतवदना भार तो साहवेना
इथे शेषाचं वर्णनही दशशतवदन असं करून बंधात चपखल बसवलं आहे.

४)  व्यजनबंध ९६/१२

व्यजन म्हणजे पंखा! शार्दूलविक्रीडित वृत्त पंख्याच्या आकारात बसवलं आहे.

वज्रांगें सधटें महाबळकटें वीरांकरीं कांबिटें
बाणाचीं तकटें मुखें पसरटें ताटें निघोटें निटें
टे हे अक्षर पंख्याच्या कळीत बसवून बाकीचा शब्दडोलारा उभारला आहे.

५)चामर किंवा चवरीच्या आकारातील बंध. इथेही स्रग्धरा वृत्त आहे आणि चामराची कळ आहे ‘गी’ ९०/२२

वैदर्भी कोमलांगी युत जडितनगीं दिव्यरत्नें अनेगी
जैसी गंगा प्रयागीं गवसित अपगी सागरा जाय वेगीं
तशी ओढीनं श्रीकृष्णाच्या भेटीला रुक्मिणी निघाली आहे.

६)मालाबंध हा अतिशय अवघड प्रकार.    माळिणी  दोऱ्यातून गाठी मारत माला तयार करतात तसा हा बंध. वृत्त आहे वसंततिलका. ९३/३६

विश्वाली विजुमद्युति हेमकांती
द्बोलीडुवप्रतिमा वसंतीं
ग्रें निकीसि निरीक्षिलि नारि आली
र्षें ती रिलुब्धलि माळ घाली.
यात पहिलं अक्षर आहे तेच तीन अक्षरं सोडून येतं. उ – उ, अग्रें असि, हर्षें हरि,
तसंच तिसरं अक्षर तीन अक्षरं सोडून येतं..
ओळींतील दहावं आणि शेवटचं अक्षर सारखं आहे.

७)भुजंगप्रयातातील अश्वबंध देखणा आहे. ९६/१०

तुरंगी कसे वीर शोभेति भारी
करी हातयंत्रें धनुर्बाणधारी
कुरंगाकृती वीर शोभेति भारी
शिरीं आतपत्रे तनुत्राणधारी

अशा विविध बंधांखेरीज विठ्ठलाच्या काव्याचा आणखी एक विशेष म्हणजे जुन्या कथांचे संदर्भ असलेल्या रचना २९/८

दुर्योधन धर्माला निमंत्रण पाठवतो तेव्हा धर्माला आश्चर्य वाटतं. म्हणतो… आज सूर्य कुठे मावळला…
१७७/१४

एखाद्या गोष्टीवर पाणी सोडणे म्हणजे त्याग करणे हाही वाक्प्रचार विठ्ठल द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी काव्यात गुंफतो. (१७९)

हातात नाही दमडा आणि घ्यायला चालला कोंबडा – अशी एक ग्रामीण म्हण आहे. तशाच अर्थाने द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी (१९०/१३०) दुर्योधनाला कावळ्याची उपमा देत कवी म्हणतो

१७७/११गंगास्नानानें पुण्यप्राप्ती व्हावी यासाठीं लोक दूरवर जातात. एखादा आळशी असा असतो, त्याच्या जवळ गंगेचें पात्र येते आणि स्नानाचा लाभ घडतो.
‘मला पैसाअडका नको, मला धर्माला भेटायचं आहे,’ साश्रू नयनांनी केलेल्या या नाटकाला फसून विदुर धर्माकडे, सुयोधनाला तुझी फार आठवण येत आहे हे सांगायला जातो.
विदुर स्वतः आपल्या घरी चालत आलेला बघून धर्माचा आनंद गगनात मावत नाही. ‘आळशावर गंगा लोटली’ ही म्हण खुबीने गंगेचे गौतमी हे नाव कामदा वृत्तात खोवून, बोलण्यात घरगुती स्वागताचा बाज ठेवून
धर्माचा अत्यानंद व्यक्त केला आहे.

लेखात वापरलेली सर्व छायाचित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत.

Author

Leave a Reply