मुक्तेश्वर भाग २
रसोत्पत्ती, अलंकार, व्यक्तिचित्रण अशा काव्यपूरक सौंदर्यगुणांनी मुक्तेश्वरांच्या काव्याला आगळा बहर लाभला आहे.
मुक्तेश्वरांची रचना मुख्यतः ओवीबद्ध. ओवी चार पंक्तींची. पहिल्या तीन ओळींत विषयाच्या भावाला अनुरूप असं सुरेल यमक :
येथील श्रोते हे परिसणे|
तुमचें अवधान परीस तेणें
माझे वक्तृत्व हें लोहगुणें |
अमूल्य होईल कांचन ||
व्यासांची रचना मराठीत आणताना हे सजवलेलं गोड रूपक आणि श्रोत्यांप्रति असलेला विलक्षण आदर मनात ठसून जातो. या भागात आपण त्यांनी रेखलेले अलंकार, गेयता आणि भावनिर्मितीसाठी केलेला विविध वृत्तांचा वापर, कल्पकता, योजलेले काही विशेष शब्द यांचा आस्वाद घेणार आहोत. हा लेख म्हणजे एक छोटा झरोका आहे. त्यातून त्यांच्या अतीव गोडीच्या लेखनाची फक्त चुणूक बघू या.
प्रसंग आहे मयासुराने निर्माण केलेल्या सभेचा! नारदमुनी ‘कच्चित्’ या प्रश्नार्थक संस्कृत अव्ययाने सुरुवात करत धर्मराजाला राजनीतीचा बोध करत होते. याचे मराठीत रूपांतर करताना ‘कच्चित्’साठी मुक्तेश्वरांनी ‘कीं’ या अव्ययाचा वापर केला आहे.
अंगींचें एक रोम उपडे|
तें जैसें हृदयांत ठाउकें पडे|
तेवीं प्रजा पावतां पीडे|
जाणसी कीं तात्काळ |
अंगावरचा केस उपटला की वेदना उमटते; तितक्याच प्रकर्षाने प्रजेचं किंचितसंही दुःख आपल्या मनात प्रतिबिंबित व्हायला हवं. साध्या शब्दांत समवेदनेची अधोरेखित केलेली गरज. भाषांतरही शब्दाला शब्द असं कोरडं नाही.
व्यासवचन इक्षुदंडु|
गाळून सुरस सारांश गोडु|
देशभाषा वळिले लाडू|
नाबदेचे आवडी||
( नाबद म्हणजे उसाचे करवे) व्यासवचनांच्या उसाचा रस गाळून त्यांनी देशीभाषेचे लाडू वळले म्हणूनच साखरेसारखी गोडी त्यांच्या रचनेतून पाझरते. भावनोत्कर्ष, रसाळता या गुणांना वेचक शब्दांची जोड ते देतात.
चातुर्य रत्नाकर राजहंसी
साहित्य शब्दाक्षर मुक्तराशी
मोत्यांसारखे दळदार शब्द राजहंसाप्रमाणे वेचून त्यांनी साहित्यपट घडवला. वरच्या इंद्रवज्रा वृत्तासारखीच विविध वृत्तांत त्यांनी रचना केली आणि रचनादृष्ट्या पूर्वसुरींच्या ओवीबद्ध रचनेच्या पुढचं पाऊल टाकलं.
सुचिरसहजवासें गौतमीच्या तटाकीं|
अतुट भजनपंथें पंथ टाकीत टाकीं|
द्विजवरकवि नामा मुद्गलू अत्रिगोत्री|
विमल वचनमुक्तें लेववी संतश्रोत्रीं||
मालिनी वृत्तातल्या या रचनेत त्यांनी स्वतःचं आडनाव, गोत्र गुंफून, सहज यमक साधत निर्मळ वचनमुक्ते — विचारांचे पाणीदार मोती श्रोतृवृंदाच्या कानांमध्ये जडवायचा विचार बोलून दाखवला आहे.
रामायणाचा पट मांडताना शार्दूलविक्रीडित रचना केली आहे.
श्रीमद्रामपदांबुजे हृदि सदा ध्यातुर्भवाब्धेर्मिया|
मुक्तेशस्य विराजते सुरुचिरा वाणी गुणग्राहिणी||
सुरुचिर वाणीतून जीवननाट्याचं सघन दर्शन त्यांनी उभं केलं. तत्पूर्वी ओवीतून उपदेशामृत पाजलं जात असे, काव्याला शिकवणीचं रूप होतं. मुक्तेश्वरांच्या मुक्त होत चाललेल्या काव्यामधून तत्कालीन जनमानस, स्वभावधर्म यांचं सुस्पष्ट रेखाटन दिसून येतं. स्वतःकडे याचा कर्तेपणा ते घेत नाहीत.
विश्वंभर श्रीगुरुच्या प्रसादें|
आनंदवाचा वदलो विनोदें|
कामक्रोधादि विकारांमुळे संसाराच्या समुद्रात गटांगळ्या खाणाऱ्यांना ते भक्तीचा उपदेश करतात.
संसारार्णविं दुस्तरीं बहु बहू कामादिकीं पीडिलें
दंभोपाधिक नेममायिक सुखा
दाराधनें गोविलें
विद्यावादवितंड जालकलनीं
सर्वांसि गर्वाथिलें
पद्मावल्लभपाद सूलभ जगीं
निर्धारितां मानले|
वृत्तात लिहिताना त्यांनी ऱ्हस्व दीर्घाचा मुलाहिजा बाळगला नसला; तरी अनेक उपमा, दृष्टान्त देऊन काव्याखेरी भक्तीची, उपदेशाची सुघड टीप या काव्यपटाला ते घालतात…
रघुकुळ टिळकाचें नाम वाचे वसों दे
रतिसुखाचा काम जीवीं नसों दे
मग तुज न लगे ती मुक्तिचिंता कराया
परमगति विमुक्ती आप लागे वराया|
मुक्तेश्वरांच्या वृत्तवैभवात विविध अलंकारही भर घालतात.
निवडुंगाचं पान खुडलं की दुधासारखा स्राव येतो. ते दूध नसतं.
अर्क निवडुंग सदा मस्त|
मोडितां दिसे दुग्ध श्रवत|
… याला दूध म्हणणं म्हणजे
जैसे प्रपंची विवेकरहित|
सुख बोलती विषयांतें||
दागदागिने, पैसा हेच सुख समजणाऱ्यांचं सुख निवडुंगाच्या चिकासारखं भासमान आहे! या उपमेवरून साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे या पंक्तीची आठवण होते.
अठरा अक्षौहिणी सैन्य मारलं गेलं, शंभर पुत्र मारले गेले म्हणून धृतराष्ट्र शोक करत असताना संजय समजावतो,
अभ्रें वितुळलीं निराळीं
नाना बुद्बुद विराले जळीं
तैसे अचूक काळानळीं
(काळरूपी अनळात- अग्नीत)
भस्म जाले असंख्य|
निसर्गउपमा त्यांच्या काव्यात अशा चित्रपटासारख्या समोर दिसतात आणि आशय बिंबवण्याचं कार्य करतात. पांडवांचा नाश करण्याचे मनसुबे दुर्योधन करत असताना लाक्षागृहाची योजना त्याच्या मनात येते. पांडवांनी वर्षभर सुखाने तिथे कालक्रमणा केल्यावर ‘जातुषालयाचा’ पावक प्रदीप्त करावा आणि त्यामाजी ‘वैरी होमावे’ असे गुप्तकार्य साधावे — असा त्याचा नीच विचार! या विचारांना पुष्टी देणारे, वाहवा म्हणून साथ देणारे त्याचे टाळकंपू! त्यांचा नीचपणा श्रोत्यांवर ठसावा या उद्देशाने मुक्तेश्वर बीभत्स उपमा देतात :
ऐसी दुर्योधनाची वचनें|
येरें झेलिलीं अंतःकरणे|
जेवीं का वांती होता श्वानें|
त्वरें चाटुनि घेइजे|
फक्त सौंदर्य खुलवणारं साधन म्हणून नव्हे; तर अपप्रवृत्तीचा प्रकर्ष साधण्यासाठीही मुक्तेश्वर असं अलंकारांचं चपखल उपयोजन करतात.
अनुप्रासाचे वेगवेगळे प्रकार मुक्तेश्वरांच्या रचनेत अगदी लीलया गुंफून गेलेले दिसतात.
दहाडे धडाडे सुडे धायगाडे
धडा ताडिता मोडिती हाड मोडे
शिरे फोडिती मोडिती मान शुंडा
मुखें फाडिती ताडिती ग्रीव तोंडा||
वीररसाला पोषक ‘ड’चा अनुप्रास असा चित्रदर्शी!
गजगती जगतीवरि चमके
मलमती लपती पतिसामुके
अशी वर्णपुनरावृत्तीही चमत्कृतीपूर्ण ठरते.
पवित्र विश्वामित्रबाळा
शकुंतला अलिकुंतला
म्हणे कुंतलमंडळपाळा
असा अनुप्रासही मुक्तेश्वरांना प्रिय आहे. रजनी- रजनीकर, दिन-दिनकर यात ‘कर’ अक्षरं जोडल्यामुळे मूळ शब्दाचा अर्थ बदलतो. त्याला शब्दानुप्रास किंवा लाटानुप्रास म्हणतात. जलकल्लोळीं जलक्रीडा, कनकवर्ण कनकांबरी, वंशी वंशधर अशा लाटानुप्रासांची उधळण मुक्तहस्ते मुक्तेश्वरांनी केलेली दिसते.
पवित्र शीतळ जळ माथां मंदाकिनी
कंठी धरियला वन्ही, नवल काय?
गरूडारूढ मधुसूदन हृदयीं वसिजे पूर्ण
कंठीं सर्पाभरण, नवल काय?
सिंहावरी ओळंगत अंकीं गिरजा स्वस्थ
मारिला कुंजर दैत्य, नवल काय
प्रश्नाचं उत्तर त्यातच दडलेलं असतं असा हा प्रश्नालंकार लेववून पुढे मुक्तेश्वर म्हणतात
अहो लीलाविश्वंभरा
कृपामूर्ती जगदोद्धारा
तारिसी मुक्तेश्वरा नवल काय…
म्हणजे तारशीलच!
अलंकारांच्या या मांदियाळीत
पुण्यश्लोकांमाजी पहिला|
सत्वशील सत्वार्थिला
उपमेय बोलावया बोला
दुजा नाही ब्रह्मांडी
अशा सहजतेने अनन्वयाचीही पेरणी केलेली दिसते.
स्वभावोक्ती अलंकार मुक्तेश्वरांच्या लेखनाचा स्थायीभाव. जणूकाही समोरच प्रसंग घडत आहे, असं रामायणातील मृगाचं मालिनी वृत्तातलं जिवंत वर्णन :
सरळ चबक दावी थोकला पाठ चाटी|
पळत पळत पाहे मागता दूरदृष्टी|
श्रवण नयन पाहे खाजवी भूमि हुंगे|
विचरत मृगचेष्टा पर्णशाळेसि नीघे||
उदात्त अलंकाराचं वैशिष्ट्य आणखी वेगळंच! शितावरून भाताची परीक्षा व्हावी तसं एखाद्याच वर्णनावरून व्यक्तीची कल्पना येते; इतर गुण सांगायची गरजच पडत नाही तेव्हा उदात्त अलंकार होतो. द्यूतात हरल्यावर पांडव वनात जाताना कसे गेले याचं वर्णन आहे…
वस्त्रें आच्छादून वदन
धर्मे केले वनप्रयाण
न बोलतां कवणासी|
डोळ्यांमध्ये खदिरांगार फुलला होता. आपण बघितलं तर ‘ भस्म होईल सर्व सृष्टी’ ‘सृष्टी भस्म होऊ नये’
अशा उदात्त विचाराने धर्म वदन झाकून गेला. द्यूताच्या आहारी गेलेला अशी धर्माविषयीची नकारात्मकता दूर करण्यासाठी या उदात्त अलंकाराची योजना केली असावी.
मुक्तेश्वरांच्या लेखनातील रूपकांची लयलूटही आशय-श्रीमंतीला पूरक ठरते. भीमाचा जन्म वायूपासून झाला होता. व्यजन म्हणजे पंखा. व्यजनवात म्हणजे पंख्याचा वारा, पुण्याची वात सरली, आयुष्यतेलाचा दिवा (भीमरूपी) वाऱ्यामुळे विझून जाईल असं रूपक योजून जरासंध युद्धप्रसंगाचं वर्णन ते करतात.
सरला सुकृताचा तंतु
आयुष्यतैला झाला अंतु
माझिया हस्तीं व्यजनवातु
भीमरूपें उदेला|
बालपांडवांच्या बाळलीला बघून
‘जनकजननी यांची मनें|
विसरोनि गेलीं भूकताहाने
दर्शनें अमृताचेनि पानें|
दृष्टि दोंदील तयांची|
डोळ्यांनीच आस्वाद घेतल्याने डोळेच पोट झाले असं हे मजेशीर रूपक.
आग्रहें सेवी अयोग्य गुरु
तो शिष्य तेलियाचा ढोरू
डोळे बांधोनि निरंतरू
फेरे घाली त्या भवते.
अयोग्य गुरूच्या भोवती फेऱ्या घालणाऱ्या, फसलेल्या शिष्यांना रूपकातून त्यांची जागा ते दाखवून देतात.
यमकाची चातुर्यपूर्ण सहजता आनंददायी!
भीष्मआज्ञा होतां त्वरें
व्यासात्मज चालिला उत्तरे
तेणें रायांचा मद उतरे
शरण येती तयासी
यमक गेयतेसाठी पूरक ठरतंच; शिवाय चालीवर म्हणताना मौजही आणतं. अशीच एक ‘टका’री मौज.
आपुली करी सुटका
भवभ्रम अवघा लटिका
आधीच नरदेह फुटका
शाश्वत मानू नको क्षण घटिका
गुरुचरणांबुज घुटका
सेवुनी मनासी लावी चटका
करुनि मनाचा मुटका
मुक्तेश्वर चुकवी यमझटका
मुक्तेश्वरांच्या काव्यातील असे अलंकार केवळ भाषाप्रभुत्व सिद्ध करणारे नव्हेत. वैश्विक अनुभूतीची जाणीव करून देत ते विचारांचा पैसही वाढवत नेतात.
विश्व हे अवयव आपुले
यांहीं केल्या आपण केलें
ऐसें समाचार ज्या कळलें
तोचि निश्चयें जगदात्मा|
रसनिर्मिती हा काव्यातील महत्त्वाचा भाग.
भारतकथा अमृतवल्ली|
श्रवणमंडपीं नवरसफुलीं
फुलोनि मोक्षसुखाचे फळीं
लवोनि आली फळभारे
प्रसंगनिहाय सहजस्फूर्त रस हा मुक्तेश्वरी काव्याचा मोठा विशेष आहे. मयसभेचं अतिशय देखणं वर्णन,
सोमकांताच्या पाषाणीं
विचित्र वापिका पुष्करणी
माजी पुष्करें नानावर्णीं
असा चित्रदर्शी आणि नादमय अनुप्रास कानाने ऐकत, डोळ्यांनी वाचत आणि मनाने चित्र बघत वाचक रंगलेला असताना अचानक
स्फटिकभूमिकें भ्रमंती डोळे|
स्थळें तेथें दिसतीं जळें
साधा रस्ता आहे तिथे पाणी समजून
वस्त्रे सांवरुनि बळें
चालतां चतुर हांसती|
आणि
जळ असतां स्थळ भासत
चालतां पडती वस्त्रासहित
बुचकळिया देतां होत
महाविनोद जनांतें
मार्ग आहे असं वाटून चालायला लागला…
चालता आंग भिंती भागीं आदळें
असा हास्यरस निर्माण होतो.
गांधारीचे शतनंदन आणि ५ पांडव असे बाळक्रीडा करत असताना भीम एखाद्या सिंहासारखा भासत असे. कौरव वृक्षावर चढून फळं तोडत आहेत हे बघितल्यावर
‘तें झाड ताडितां वज्रलातें|तळीं पडती दडदडां|
कधी स्वतः हत्ती आहोत आणि कौरव तस्कर आहेत अशी कल्पना करून त्यांना आपल्या पायांना बांधून पळत सुटे! कौरवांना त्रास देणारं हे अद्भुत चित्रदर्शी वर्णन वाचक ओवीतूनही अनुभवत जातो.
कीचकवध प्रसंगी मुक्तेश्वर भय, कुतूहल आणि वीर असे तीन रस एकत्र आणतात.
कीचकाच्या भडकलेल्या वासनेला अत्यंत शांत चित्ताने बंध घालत सैरंध्री म्हणते, जे कां कुंकुम-तांबोलहीना, रुदीत, क्षुधित अशी अंगना वर्ज्य करावी. धीर धर, उद्या सूर्यास्त होताच जन्मवर भोगिसी! यातल्या ‘भोगिसीचा’ दोन अर्थांपैकी सैरंध्रीला अभिप्रेत अर्थ आपल्याला माहीत असूनही मनात धस्स होतं. वाचक झपाट्याने पुढे वाचू लागतो… ‘पातली याज्ञसेनी नेमकाळीं नेमिष्ट’ तेव्हा तो म्हणतो, बैसें मंचकीं वल्लभे| तिचं चुंबन घ्यायला गेल्यावर
‘भीमे ताडिला चडकणा|
हस्तभारें निष्ठुरें|
सव्य पाय देवोनि उरी… दोन्ही हात उपटून काढले. सोडले रक्ताचे खळाळ नदीलोटासारिखे| असं वर्णन गुंगवून ठेवतं.
याचाच विरोधाभास असणारा करुण रस! अश्वत्थाम्याला दूध प्यावंसं वाटत असता, पाण्यात कालवलेलं पीठ
माता भरोनि पर्णद्रोणीं
द्रोणीलागीं देता वदनीं… अश्वत्थामा आनंदानं ते ‘दूध’ पितो…
हे देखोनियां हृदयकमळीं द्रोण दुःखें जाकळे…
वाचताना डोळे भरून येतात; शिवाय द्रोण या शब्दाचा वेगवेगळा अर्थ काव्यसौंदर्य वाढवतो.
‘येऊनि बैसे मांडीवरी|
होई अंतुरी पट्टाची’
असे किळसवाणे भाष्य दुर्योधन करतो तेव्हा
पापशब्द पडतां कानीं
हृदयीं धडकला क्रोधवन्ही
अशी अवस्था होऊन द्रौपदी म्हणते
तुझ्यासाठी भीमाची गदानवरी ठरवली आहे. बोहले म्हणून रण ठरवले आहे. आयुष्य हाच अंतरपाट आहे, लाथांच्या अक्षता, रक्तबंबाळ शरीर ही हळद, बायकांचं रडणं हा वाद्यध्वनी असा सुखसोहळा भोग! संताप आणि उपहासातून आलेल्या या द्रौपदीच्या वाक्ताडनातून वाचकांच्याही मनात क्रोध आणि समवेदना दाटून येतात.
करूनि खिंखाट गर्जना
कंठीं रोऊं धांवे दशना
भीमें हाणोनि चडकणा
दंतपंक्ती पाडिल्या
असा रौद्ररस
तप्त लोह उष्णता गात्री
खदिरांगार रक्तता नेत्रीं
तीव्र श्वास टाकी वक्त्री
काळसर्पासारिखा!
असा दुर्योधनाचा राजसूयावेळचा भयानक रस वाचकाला गुंगवून ठेवतात.
करिशावकशुंडादंड
तैसे सरळ भुजदंड
कंकणें रुणझुणती प्रचंड
मदनातें चेतवावया|
शृंगाराचा असा थेट उल्लेख मुक्तेश्वर करतात. पूर्वसुरींच्या लेखनाच्या पुढचं आणखी धीट पाऊल!
भीम आणि हिडिंबा विवाहानंतर कुठे कुठे फिरले हे वर्णनही मुक्तेश्वर रंगून करतात…
गुहागव्हरीं पर्वतमौळीं|
नाना रमणीक वनस्थळीं|
नदीपुलिनीं गंगाजळीं|
क्रीडा करी मनेच्छा||
शृंगाराचा आणि रूपकाचा अतिरेक आणि त्यातून उद्भवलेली अश्लीलता मात्र मुक्तेश्वरी लेखनाला बट्टा लावते.
पांडवप्रताप पुरुष तरणा|
नववधू कौरवसेना|
शृंगारिली परी संघटना|
युद्धसुरता न थारवे
गळालें अभिमानाचें वास
अधैर्याचे मोकळे केंस
रणशय्यासनीं त्रास
पावोनियां पळाली|
कर्णसैंधव पयोधर पीन
मर्दितां झाले आरक्तवर्ण
शकुनी कंचुकी आवरण
पडिलें कोठें नेणवे
शस्त्रधारा तीक्ष्ण दांतीं
चुंबितां मुख आंतलें क्षिती
झाली रूपाची उपहती
कौरवसेनावधूची|
अति सर्वत्र वर्जयेत्| या सुभाषिताची इथे आठवण होते.
बीभत्स रसातील रचना अंगावर काटा आणते.
२५ महिने कुंती आणि गांधारीची प्रसूती होई ना! इकडे कुंतीला बाळसूर्यासारखा तेजस्वी पुत्र झाला; त्यामुळे गांधारीच्या मनात ईर्षा जागृत झाली.
‘उदर ताडिलें पाषाणें|
निष्ठुरकरें रागिटा|’
गर्भ गळून पडला आणि
रक्तवर्ण मांसपेसी|
तळीं पडली लबथबित|
मग व्यास प्रकटले आणि त्यांनी
‘फणसामाजील बीजकण|
काढितां निघती भिन्न भिन्न|
तेवीं अंगुष्ठपर्वप्रमाण|
मांसगोळे निवडिले||
असे शंभर गोळे मडक्यात तूप घालून
‘घांटुनियां येकमूस| व्यासें केलें हस्तकें||
(१०० वा पुत्र जन्मला ही ओवी १००वी आहे. हा योगायोग नसावा.)
मडक्यातून जन्म झाल्यावर बाळाने रासभरवें- गाढवाच्या आवाजात टाहो फोडला. त्याला ओ देऊन ‘रासभीं दिला प्रतिशब्द| मेघ वरुषे रक्तधारा, प्रळयवारा सुटला, वृक्ष उन्मळून पडले. गिधाडं, कोल्हे, कुत्रे, कावळे या साऱ्यांनी बाळाच्या सुरात सूर मिळवला… असा भयानक रस जिवंत उभा राहतो.
या विविध रसांमध्ये खाद्यरसाचाही चविष्ट शिडकावा होतो.
साक्षाद्भर्जित- खापरावर भाजलेलं, उत्काथित( कढवलेलं), स्वेदित(वाफवलेलं), तैलपाचित, गोड, तिखट, तुरट(कषाय), कटुक, आम्ल, लवण… असे षड्रस काव्यात सरसता आणतात.
मुक्तेश्वरांच्या काव्यातील गमतीशीर दोष म्हणजे मध्येच ते महाभारत काळातून बाहेर येतात आणि कालविपर्यास करतात.
विद्यानैपुण्य सादर करण्यासाठी मोठे परीक्षागार सजवले जाते. निरनिराळ्या डावपेचांचं वर्णन करताना महाभारतातून मुक्तेश्वर त्यांच्या काळात येतात आणि
‘खेटक करवाळें सतेज|
सूडसाधनीं इसाळ पैज|
त्या नांव महाराष्ट्र झुंज, कटी कतारे हातात घेणारे कर्णाटकी, आड करूनि पर मारणारे तैलरंग इतकंच काय बर्बरयुद्ध, पाणिचोर – समुद्री चांचे, फिरंगी यांचे युद्धातील डावपेच यांचंही वर्णन ते रंगून जाऊन करतात. हा काव्यदोष असला तरी तत्कालीन जीवनातील युद्धतंत्राची चुणूक मात्र मिळते. पांडवांना लाक्षागृहात नेत आहेत हे विदुर त्यांना सांकेतिक भाषेत सांगणार होता. कोणती भाषा वापरावी हा विचार करताना, ‘बर्बर बोलती बर्बरदेशीं| म्लेंछभाषा बोलिजे तीसी| म्लेंछभाषा बोलून धर्माला सतर्क करावं असा विचार महाभारत काळात विदुर करतो. पुढे पांडव लाक्षागृहातून सुखरूप बाहेर पडल्यावर ‘यवनभाषेतील’ गुप्त निरोप कर्णपुटीं सांगतो.
तू तंव विद्यासमुद्रजगतीं|
निश्चयें मानिला माझ्या चित्ती|
मीही कुशल असे गणिती|
लीलावती ग्रंथज्ञ||
१२व्या शतकातील लीलावतीचा उल्लेख महाभारत काळात मुक्तेश्वर करतात.
जाबी जंगी फिरंगी क्रूर
नायी इंग्रज मल्लोवार
कावे कावटे कंकमखर
जळतस्कर माशांशी(मांस खाणारे)
याखेरीज रूमशाम ( कॉंस्टॅंटिनोपॉल ), खोरासन, मुलतान, हबशान, अरबस्तान अशा सर्वांना दुष्यंत मांडलिकत्व देतो.
द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी श्रीकृष्णाच्या अकराव्या अंबरावताराचं वर्णन करत द्रौपदीला नेसवलेल्या रजतपाटऊ, दुधात भिजवून उन्हात वाळवलेली अशी विविध प्रांतांतल्या लुगड्यांची लगड ते समोर ठेवत जातात; पण त्यांच्या काव्यगुणांपुढे या त्रुटी किरकोळ वाटाव्यात अशाच आहेत.
उगाणितां ( जिंकणे)
वाहिनीपति- सेनापती
रहंवर – रथश्रेष्ठ
शातकुंभस्तंभसोज्वळा तैसी गोरेपणाची कळा… शातकुंभ म्हणजे सोनं
आइणीपाइणी म्हणजे वासना स्वाडदिवस म्हणजे चांगला दिवस असे विविध शब्द त्यांच्या लेखनात येतात आणि आपल्या शब्दसंपदेत भर पडते.
इतकं सुरस काव्य लिहूनही
व्यास वाढितां जगातें
ग्रास लाधला जीर्ण कवींतें
त्यांच्या मुखींची उच्छिष्ट शितें
म्यां दुर्बळें वेचिलीं
ही त्यांची नम्र भावना आहे. अशा मुक्तेश्वरांच्या लेखनगुणांविषयी लिहायला माझी शक्ती अपुरी आहे. हा लेख म्हणजे त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर
‘परम भणग दीनें वाहिला बेलपाला’
सुषमा जोशी
