महुद  ते ह्युस्टन : १ 

माझी २६ वर्षांची शिक्षण मॅरेथॉन

१) महुदची वर्षे (इयत्ता १ ली ते ४ थी) १९६२-६६

लोक मला विचारतात  माझ्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये २६ वर्षे शिक्षण घेण्याचा उत्साह आणि संयम कसा होता?  मी गमतीने सांगतो,  “मी खरंतर माझ्या शिक्षणाची ३ वर्षे वाचवली! देवाचे आभार, माझ्या पालकांना मला झोपण्यासाठी आणि खेळण्यासाठी शाळेत पाठवण्याचा खर्च करावा लागला नाही.” (अर्थात, जेव्हा मी ३-५ वर्षांचा होतो, तेव्हा आमच्या महुद  या छोट्या गावात पाळणाघरे किंवा मॉंटेसरी – ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजी शाळा नव्हत्या).

   खरेतर  पीएच. डी. डॉक्टर बनण्याचे नशीब किंवा भाग्य  घेऊन मी जन्मलो नव्हतो.  (माझ्या एका खूप चांगल्या डॉक्टर मित्राने माझ्या Ph. D.  ची फोड, “Poor Humble Doctor!” अशी करून मला मी स्वतःला ‘डॉक्टर’ म्हणू शकतो असा  दिलासा दिला.) किंवा माझ्या बालपणी अभियंता बनण्याचेही  स्वप्न मी पाहिले नव्हते. हे बहुतेक इतर लोकांसारखेच घडले – एका वेळी एक पाऊल – मी (किंवा माझ्या पालकांनी) घेतलेल्या छोट्या निर्णयांच्या मालिकेद्वारे. अर्थात, माझे वडील डॉक्टर होते  आणि माझी आई १९६७ मध्ये आम्ही पंढरपूरला जाईपर्यंत गृहिणी होती. तिने पंढरपूर कॉलेजमध्ये  चक्क प्रवेश घेतला. (आपल्या शाळेत जाणाऱ्या  तीन मुलांसोबत आणि  शालेय शिक्षण  पूर्ण केल्यानंतर १५ वर्षांनी) आणि प्रथम श्रेणीत बी.ए. पूर्ण केले!! ६० वर्षांपूर्वी आम्ही मध्यमवर्गाच्या प्रचलित विचारसरणीवर पूर्णपणे विश्वास ठेवून  होतो : चांगल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेवर  प्रवेश मिळवा, कठोर परिश्रम  आणि प्रामाणिकपणे अभ्यास करा, वर्गात अव्वल राहा, तुमच्या आवडीच्या क्षेत्रात उच्च पदव्या मिळवा, मग चांगल्या कंपनीत नोकरी मिळवा, तुमची नोकरी किंवा व्यवसाय  प्रामाणिकपणे आणि समर्पण भावनेने  करा. मग, एके दिवशी ५८ वर्षांच्या आसपास, तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरासह (बंगला, २० व्या शतकातील मध्यमवर्गीय भारतीयांचे सर्वोच्च स्वप्न) सन्मानाने आणि शांततेत निवृत्त होऊ शकाल आणि उर्वरित ५-२० वर्षे (सरासरी आयुर्मान ६५-७५ वर्षे असल्याने) तुमच्या कुटुंबासोबत (मुले आणि नातवंडे) आधुनिक ‘वानप्रस्थ आश्रमाचा’ आनंद घेऊ शकाल.

(टीप: माझ्या दोन भावांनी आणि मी या सल्ल्याचे पालन केले. माझा मोठा भाऊ, डॉ. विलास, याने मुंबईच्या शासकीय दंत महाविद्यालयातून बीडीएस आणि एमडीएस पूर्ण केले. १९७९ मध्ये डोंबिवलीत स्वतःचा दवाखाना सुरू केला, नंतर १९८१ मध्ये तळेगाव-दाभाडे येथे गेला आणि ४३ वर्षांपासून तेथे एक अतिशय यशस्वी दंतचिकित्सक आहे. माझा धाकटा भाऊ, दीपक, याने बेडेकर महाविद्यालय – ठाणे, येथून बीएससी ची पदवी घेतली. विविध कंपन्यांमध्ये व्यवस्थापनाच्या विविध स्तरांवर काम केले. एफजीपी लिमिटेड इथे उत्पादन व्यवस्थापक तर जॉली बोर्ड्स, मुंबई येथे कारखाना व्यवस्थापकाच्या उच्च स्तरावर पोहोचला. आम्ही घरात त्याला नंदू म्हणतो. नंतर त्याने नाशिकमध्ये आपल्या मित्राबरोबर जवळपास १५ वर्षे डोमेस्टिक वायरिंग ऍक्सेसरीज बनविणारी स्वतःची कंपनी यशस्वीरीत्या चालविली. त्याने २०२० च्या उत्तरार्धात निवृत्ती घेतली आणि आता पुण्यात राहतो.).

महुदमधील आमची शाळा, ‘किसान बालक मंदिर’ खूप लहान होती.  प्रत्येक इयत्तेला एक शिक्षक होता. बाहेर खेळण्यासाठी खूप जागा होती. माझ्या काही आठवणींमध्ये : १५ ऑगस्टची परेड (‘प्रभात फेरी’), ‘बैलपोळ्या’च्या दिवशी सजवलेल्या बैलांची मिरवणूक, हनुमान जयंतीच्या आरत्या आणि ‘गावजेवण.’ त्यात नेहमी केली जाणारी  ‘गव्हाची खीर’ आदी गोष्टी आहेत. आम्ही मुख्य गावापासून १-१.५ किमी अंतरावर, सिंचन वसाहतीजवळ राहत होतो. आम्ही घराबाहेर असलेल्या मुबलक मोकळ्या जागेत  खेळायचो. 

  घरात पाण्याचे नळ नव्हते.  आम्हांला जवळच्या विहिरीतून पाणी रहाटून आणावे लागत असे.  गावात वीज नव्हती. रॉकेलचे दिवे आणि मेणबत्त्या वापराव्या लागत. कपडे धुण्यासाठी घरात पाणी नसे. जवळच्या ओढ्यावर जावे लागे. तेथे  आम्ही कधीकधी पोहण्याचा आनंद घेत असू आणि साप, झुरळे, उंदीर, विंचू (होय, आम्ही ‘इंगळी’ म्हणजे ‘मोठा विंचू’सुद्धा पाहिले आहेत. ) आणि घरात गोम (शतपाद) यांचा सामना करावा लागत असे. रोज गवळ्याकडचे रतिबाचे ताजे दूध येत असे.  जवळच्या झाडांवरची फळे (‘उंबर’, ‘शिंदोळ्या’, ‘बोरे’) खाणे, कधीकधी जवळच्या शेतातून (‘जंगलुद्दीनचा मळा’) कैऱ्या चोरणे. मला या काळातली कोणतीही भयकथा आठवत नाही, अगदी  आम्हांला रात्री दीर्घशंकेला घरापासून सुमारे २०० मीटर अंतरावर असणाऱ्या  संडासात जावे लागायचे तरीही…    मला तेथे माझ्या पहिल्या ९ वर्षांच्या फक्त काही आनंदी आणि रोमांचक आठवणी आहेत. आम्ही अनेक स्थानिक खेळ खेळलो : हुतुतू, गोट्या, लगोरी, रिंग, विटी-दांडू आणि अर्थातच क्रिकेट. तसेच, आमचे संपूर्ण कुटुंब कॅरम चँपियन होते. अधूनमधून काही काका, काकू, चुलत भाऊ, आजी-आजोबा आम्हांला भेटायला येत आणि  काही दिवस थांबत. आमचे आवडते : पुण्याचे मोहनकाका, माझ्या वडिलांचे सर्वात लहान भाऊ खूप चांगले गाणे गात आणि हार्मोनियम सुंदर वाजवत. त्यांनी आम्हांला एक गाणे शिकवले होते – जे मला वाटते त्यांनीच रचले होते – ते  आम्ही आमच्या बेंबीच्या देठापासून “याको काळे, रुद्र वीणे !!!!” ओरडू शकत होतो.  

२) ५ वी इयत्ता, सोलापूर (१९६६-६७)

महुदमधील माध्यमिक शिक्षणाची गुणवत्ता फारशी चांगली नसल्यामुळे, आमचे संपूर्ण कुटुंब १९६६-६७ दरम्यान सोलापूरला गेले. मी प्रसिद्ध हरिभाई देवकरण हायस्कूल (HDHS) मध्ये शिकलो आणि ५ C या ‘स्कॉलर’वर्गात होतो. मला फक्त त्या वेळचे काही ‘जवळचे’ मित्र आठवतात : राजेश जोशी (जो आमच्या वर्गात पहिला होता – माझ्या शालेय जीवनातील एकमेव इयत्ता जेव्हा मी दुसरा आलो), अजय पाडगावकर ( आम्ही आयआयटी बॉंबेमध्ये वर्गमित्र होतो आणि ५ वर्षे एकाच वसतिगृहात, H7 मध्ये राहत होतो; तसेच नंतर ह्युस्टनमध्ये ३-४ वर्षे एकाच परिसरात राहत होतो), प्रवीण पारसनीस आणि विलास जंगम, गणिताचा जादूगार. HDHS च्या माझ्या आठवणींपैकी एक म्हणजे मी आमच्या वर्गाच्या ‘लंगडी’ टीमचा कॅप्टन होतो. मला वाटते की आम्ही त्या वर्षी शालेय  ट्रॉफी जिंकली होती

आम्ही सोलापुरातील प्रसिद्ध भागवत थिएटरमध्ये अनेक चित्रपट पाहिले. त्या वर्षी मी पाहिलेल्या काही चित्रपटांची नावे : ‘जोहर अँड मेहमूद इन गोवा’ आणि ‘आयी मिलन की बेला.’ तसेच, एक बालनाट्य ‘निम्मा शिम्मा राक्षस’ पाहिल्याचे आठवते.

माझ्या वडिलांना महुदमध्ये एकटे राहण्यात खूप अडचणी येत होत्या. त्यांचे जेवणाचे हाल होत होते. ते दर दुसऱ्या आठवड्यात आम्हांला मोटर-सायकलवर भेटायला येत.  त्या काळी रस्ते फार चांगले नसल्यामुळे १०० कि. मी. रॉयल एनफिल्ड बुलेटने  प्रवास करणे खूप सोपे नव्हते

३) ६ वी इयत्ता, डोंबिवली (१९६७-६८)

त्यामुळे, पुढील वर्षी विलास आणि मी माझ्या दोन मामांसोबत (मोठे, महादेव – आम्ही त्यांना ‘नाना’ म्हणत होतो आणि लहान – बाळकृष्ण – आम्ही त्यांना ‘तात्या’म्हणत होतो) आणि आजोबा-आजी (बाळूदादा आणि अंबिका आजी) यांच्यासोबत डोंबिवलीत राहिलो आणि एस. व्ही. (स. वा.) जोशी हायस्कूलमध्ये शिकलो. सर्वांनी, विशेषतः सुहासमामी (तात्यांची पत्नी) यांनी आमच्यावर खूप प्रेम केले आणि कदाचित ‘लाड’ करून आम्हांला बिघडवले. मी फारसा अभ्यास केला नाही. खूप गोट्या खेळलो आणि मला फक्त ८६% गुण मिळाले. (पहिल्यांदा मला ९०% पेक्षा कमी गुण मिळाले.) आश्चर्य म्हणजे मला ‘शिवणकाम’मध्ये सर्वाधिक ९० गुण होते आणि गणितात फक्त ८८! त्यामुळे, अर्थातच, आमचे आई-वडील फारसे आनंदी नव्हते, दीपक ५ वी मध्ये जात होता आणि आम्ही पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला.

४) पंढरपूरची वर्षे, ७ वी ते ११ वी इयत्ता (१९६८-७३)

 कदाचित माझ्या आयुष्यातील ही सर्वोत्तम वर्षे होती. शाळेत  माझे  अनेक जवळचे चांगले मित्र होते आणि आमच्या शाळेतील  त्यांपैकी बरेच जण अलीकडेच फेसबुकवर माझ्याशी पुन्हा जोडले गेले आहेत. ज्यांना कुतूहल आहे त्यांच्यासाठी, होय, आमची सहशिक्षण शाळा होती आणि आमच्या वर्गात अनेक मुली होत्या. 

आम्ही अनेक ‘मैदानी’ खेळ खेळलो : अर्थातच क्रिकेट – पण आट्यापाट्या, हुतुतू, खोखो, सूरपारंब्या, लपंडाव, डबा ‘ऐस पैस, दगड का माती, गोट्या, विटी-दांडू आणि सर्वत्र धावणे.

माझे  बालपणीचे दोन छंद होते : क्रिकेट आणि हिंदी गाणी, विशेषतः बुधवार रात्री ८ :००-९:०० वाजता अमीन सयानी यांचे बिनाका गीतमाला. मी दर आठवड्याला सर्व गाण्यांची यादी करत असे आणि घोषणा होण्यापूर्वी कोणते ‘सरताज’ असतील हे मला माहीत असायचे. कृपया लक्षात घ्या की मी त्याच तासात एकाच वेळी गणिताची २० उदाहरणेही सोडवत असे.

आम्ही भावंडे दर दोन आठवड्यांनी ज्या गोष्टीसाठी भांडत होतो ती म्हणजे : इंद्रजाल कॉमिक्स (द फँटम, मँड्रेक द जादूगार आणि लोथार, फ्लॅश गॉर्डन).

 DHK शाळेच्या दिवसांच्या माझ्या अनेक आठवणी आहेत : क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये (नाटके, नृत्ये) माझा सहभाग; वादविवाद, पाठांतर (गीता, मनाचे श्लोक) आणि हस्ताक्षर यांसारख्या स्पर्धा; १०वी पर्यंत  सर्व वर्गासोबत वार्षिक सहली आणि ११वी मध्ये फक्त ६ मित्रांसोबत, पंढरपूरपासून सुमारे ९ किमी अंतरावर असलेल्या कोर्टी  येथील भगवान शंकर मंदिरात; माझ्या ८ व्या इयत्तेत पार्क मैदानावर दोन सर्वोत्तम संघांमधील – मुंबई विरुद्ध महाराष्ट्र – रणजी ट्रॉफीचा सामना पाहण्यासाठी सोलापूरला जाणे; वार्षिक चार मुख्य ‘एकादशी’ वाऱ्या आणि शहरातील लाखो यात्रेकरूंची प्रचंड गर्दी, जत्रेमधील मजेदार गोष्टी (जसे ‘मजेदार’ आरसे, ‘मृत्युगोलातील फटफटी’ इ.).

माझे पंढरपूर DHK हायस्कूलचे शिक्षक

पंढरपूरच्या द. ह. कवठेकर प्रशालेत  पाच वर्षांत मला काही उत्तम शिक्षक मिळाले.  ते मुंबईतील काही प्रसिद्ध मराठी माध्यमांच्या शाळांमधील (दादरमधील बालमोहन, माटुंग्यातील किंग जॉर्ज – आता राजा शिवाजी विद्यालय, विले पार्लेमधील पार्ले टिळक) आणि पुण्यातील (मॉडर्न, नूतन मराठी विद्यालय, भावे स्कूल, ज्ञानप्रबोधिनी इ.) शिक्षकांसारखे पीएच. डी. किंवा प्रशिक्षित नसले तरी, ते जे विषय शिकवत होते त्या विषयात खूप चांगले होते. (त्यांपैकी बहुतेक जण अनेक विषय शिकवत. ) ते सर्व  खूप प्रामाणिक होते.  त्यांना शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची काळजी होती आणि आम्ही सर्वोत्तम कामगिरी करावी अशी त्यांची इच्छा होती. 

पंढरपूरमधील माझा सर्वात अविस्मरणीय दिवस

६ जून १९७३ रोजी, सकाळी सुमारे ६:४५ वाजता एका महिलेने (पुणे SSC बोर्डातील एक अधिकारी) मला उठवले. मी माझ्या भावांसोबत आमच्या भाड्याच्या घराच्या बाहेर ‘जाळी’ असलेल्या व्हरांड्यात झोपत असे.  आमचे उप-प्राचार्य (ना. बा.) तिच्यासोबत होते. त्यांचा चेहरा आनंदाने चमकत होता;  पण त्यांचा आनंद लपवण्याचा ते  पुरेपूर प्रयत्न करत होते. तिने मला, “जा आणि चेहरा धू, शर्ट घाल आणि केस व्यवस्थित विंचर.” असे सांगितले. माझ्या आई-वडिलांना काय चालले आहे हे माहीत नव्हते; पण तिने सर्वांना तर्कवितर्क लढवत ठेवले. जेव्हा मी परत आलो, तेव्हा मुंबई दूरदर्शनचे कर्मचारी घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते. हे केंद्र  २ ऑक्टोबर १९७२, गांधी जयंतीलाच सुरू झाले होते.   तिने मला एक अद्भुत बातमी दिली, “अभिनंदन, शिरीष. तू मार्च SSC परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला आहेस!” मी “धन्यवाद” म्हणालो. प्रत्येक हुशार, मेहनती ११ वीच्या विद्यार्थ्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद!  “बन्या, द फास्टर फेणे” सारखा उडी मारली नाही किंवा किंकाळी मारली नाही याबद्दल तिला आश्चर्य वाटले. मी तिला म्हणालो, “मी नक्कीच Top 10 मध्ये असेन अशी अपेक्षा होती. तुम्ही फक्त ‘०’ काढला आहे. ”तिने मला अधिकृत गुणपत्रिका दिली, जी खालीलप्रमाणे होती (उतरत्या क्रमाने गुण, मला माहीत नाही की प्रत्यक्ष गुणपत्रिकेत ते विषयानुसार वर्णानुक्रमे होते की नाही): अंकगणित १००, बीजगणित आणि भूमिती ९९, सामान्य विज्ञान ९३, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र ९२, हिंदी ७८, इंग्रजी (लोअर) ७७, मराठी ७७. एकूण ६१६/७०० किंवा ८८% आणि दुसरा क्रमांक मिळवलेल्या, मुंबईच्या  मिलिंद श्रीखंडे याचे एकूण ६१५ गुण होते. मिलिंद आणि मी नंतर IIT बॉम्बेमध्ये B. Tech. केमिकल इंजिनिअरिंगचे वर्गमित्र होतो. त्याने IIM कोलकाता केले, नंतर व्हार्टन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये पीएच.डी केली आणि आता तो अटलांटा, यूएसए येथील जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या बिझनेस स्कूलचा प्रमुख आहे. आमचा अजूनही चांगला संपर्क आहे आणि तो कल्पवृक्ष प्रकल्पातील माझ्या मार्गदर्शकांपैकी एक आहे. मी तिला समजावले की कोणत्याही शिक्षकाने मला भाषांमध्ये ( ‘सराव’ पेपर्ससह) ७० पेक्षा जास्त गुण कधीच दिले नव्हते, त्यामुळे मी माझ्या वडिलांना सांगितले होते की मला कमीतकमी ८५% मिळतील (जे त्या काळात साधारणपणे Top 10 रँकची हमी देत असे). माझ्या आईने त्या ‘एका’ अतिरिक्त गुणाला ‘भगवान पांडुरंगाचा आशीर्वाद’ म्हटले. खरे सांगायचे तर, पंढरपूरमधील माझ्या पहिल्या चार वर्षांत, मी कदाचित कधीच मंदिरात गेलो नसेन; तथापि, माझ्या ११ व्या इयत्तेत, व्यायामासाठी, मी रोज विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे वेगाने चालणे सुरू केले! त्या दिवशी आम्हांला भेटायला आलेल्या सर्व हितचिंतक, मित्र, शिक्षक, शेजारी यांनी किती किलो ‘पेढे’ खाल्ले हे मला माहीत नाही (डॉ. पद्माकर श्रीखंडे – आम्ही त्यांना ‘काका’ म्हणत होतो, दोन्ही हातांनी पेढे वाटत होते, कारण त्यांचे दोन पुतणे बोर्डात पहिले आणि दुसरे आले होते. वृत्तपत्रांमधील मथळ्यात अनुप्रास वापरला गेला: “पंढरपूरचा पारिपत्यदार  पहिला” (फोटो पहा).

 हे   माझे गुण  पाहून आजच्या पिढीला आश्चर्य वाटू शकते. हल्ली  बहुतेक चांगल्या शाळेतील टॉपरसाठी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणे ही नेहमीची गोष्ट झाली आहे आणि दरवर्षी १००+ विद्यार्थ्यांना १० वी  SSC मध्ये १००% गुण मिळतात.

१९७३ च्या SSC बोर्ड परीक्षेत प्रथम येण्याचे श्रेय मी निश्चितपणे माझ्या शिक्षकांना, आई-वडिलांना, ज्येष्ठांना, हितचिंतकांना   आणि सुनील गावस्कर यांना देतो. गावस्कर का  हे मी एक उत्कंठा  म्हणून ठेवणार आहे. ते तुम्हाला योग्य वेळी सांगीनच. शालेय शिक्षकांशिवाय  मला इतर काही शिक्षकांनी मार्गदर्शन केले. त्यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे .  

क्षीरसागर गुरुजी – महुद  बुद्रुक (सांगोला तालुक्यातील एक गाव, पंढरपूरपासून सुमारे २५ किमी अंतरावर, जिथे माझे वडील डॉक्टर म्हणून कार्यरत होते येथून, जे दर आठवड्याला शनिवारी प्रवास करत आणि मला अंकगणित शिकवण्यासाठी आमच्यासोबत राहत होते (लक्षात घ्या, हा एकमेव विषय आहे ज्यात मला १००% गुण मिळाले!);

रेखा आणि चित्रा भालेराव या  जुळ्या बहिणी अनेक विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग घेत होत्या. त्यांनी  मला विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि बीजगणित-भूमितीच्या कोणत्याही अडचणीत मदत केली.  रेखा आदर्श प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या आणि त्यांनी २००० मध्ये एक आदर्श शिक्षिका म्हणून ‘महाराष्ट्र राज्य पुरस्कार’ जिंकण्यासोबतच पंढरपूरमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे.

पिंगे क्लासेस (दादर, मुंबई), जिथे मी मे १९७२ मध्ये भौतिकशास्त्रासाठी आणि इंग्रजीसाठी एक महिन्याचे कोचिंग घेतले. या क्लासमध्ये प्रसिद्ध नाटक कलाकार, सतीश दुभाषी शिकवत होते . 

 माझा हेतू केवळ माझ्या आयुष्यात घडलेल्या सर्व  गोष्टींबद्दल कालक्रमानुसार बोलण्याचा नाही. मला ज्या संस्कृतीत आणि वातावरणात मी राहिलो त्याबद्दलचे काही विचार, माझ्या आयुष्यात केलेल्या काही चुका, त्यातून मी कसे शिकलो, माझ्या आयुष्यातील वेगवेगळ्या ‘महत्त्वाच्या’ टप्प्यांवर मला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला – जिथे ‘निर्णय’ घेण्याच्या आणि ‘कृतीतून पाठपुरावा’ करण्याच्या धैर्याने मला अनेक वेळा मदत केली आहे हेदेखील सांगायचे आहे. 

१९७३ आणि SSC परीक्षेदरम्यानच्या काही चुका

  मला बीजगणित आणि भूमितीत ९९ गुण मिळाले. मला १०० मिळायला हवे होते, कारण मी ‘आवश्यक’ प्रश्नांची योग्य संख्या सोडवली होती (प्रश्नपत्रिकेत सूचना होती : प्रश्न १ अनिवार्य आहे. उर्वरित ७ पैकी कोणतेही पाच प्रश्न सोडवा. तथापि, माझ्याकडे १० मिनिटे शिल्लक होती. मग मी काय केले? एक अतिरिक्त प्रश्न सोडवला आणि (अति) आत्मविश्वासाने माझ्या उत्तरपत्रिकेत ‘शेवटचे ६ पैकी कोणतेही ५ तपासा’ असे लिहिले). गुण मिळाल्यानंतर, ३ महिन्यांनंतर मला समजले की गडबडीत माझ्याकडून काही ‘चिन्ह’ चूक झाली होती.

 २  मी भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये ३ गुण गमावले. मी माझ्या तयारीच्या शेवटी आळशी झालो आणि न्यूटनचे गतीचे तीन नियम ‘ऐच्छिक’ म्हणून सोडण्याचा निर्णय घेतला! का? कारण मी तसे करू शकत होतो. आमच्याकडे नेहमी कोणते प्रश्न सोडवायचे याची निवड असायची. काय झाले, जेव्हा मी शेवटच्या २ प्रश्नांवर आलो, तेव्हा मी वेळेच्या दबावाखाली होतो, म्हणून वर्णनात्मक प्रश्न सोडण्याचा आणि न्यूटनच्या तीन नियमांपैकी एकावर एक साधे सूत्र वापरून सोडवायचा प्रश्न   सोडवण्याचा निर्णय घेतला. गडबडीत  मी v² = u² + 2(as ) a (acceleration) multiplied by s (distance) मध्ये 2 चा घटक विसरलो.  आम्ही सर्वजण परीक्षा कक्षातून बाहेर येताच मला माझी चूक समजली.  

 मी १ गुणाने (एकूण ७०० पैकी) पहिला आलो हे लक्षात घेता, तुम्हांला माझ्या आईची श्रद्धा  समजू शकते  का?

शिक्षणातील राजकारण

१९७३ मध्ये श्री. बावधनी हे महाराष्ट्र SSC बोर्डाचे संचालक होते. ते पंढरपूरमधील माझ्या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांची आई पंढरपूरची होती. पडद्यामागे त्यांनी मला विचारले, “शिरीष, SSC बोर्ड पहिले १० क्रमांक सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या स्तरावर जाते हे तुला माहीत आहे का?” मला कल्पना नव्हती. त्यांनी आम्हांला सांगितले की या Top 10 विद्यार्थ्यांचे सर्व पेपर्स प्रत्येक विषयासाठी राज्यातील पाच Top Moderators द्वारे अनामिकपणे तपासले जातात आणि त्यांच्या गुणांची सरासरी काढली जाते. त्यामुळे, एकूण ३५ मूल्यांकनांनंतर, माझ्याकडे सरासरी १ गुण अधिक होता. पुण्यातील एक मुलगा(मी त्याचे नाव उघड करणार नाही, जरी त्याची चूक नसली तरी) SSC मध्ये पहिला यावा यासाठी त्यांना पुणे येथील शाळा आणि बोर्ड अधिकाऱ्यांकडून खूप दबाव आला. तथापि, त्याला ८७% होते, म्हणजे एकूण ७ गुण कमी. बावधनी म्हणाले, “जरी तो १ गुण कमी घेऊन दुसरा आला असता तरी मी कोणताही बदल करण्याची परवानगी दिली नसती.” बावधनी सरांसारख्या प्रामाणिक, नीतिवान लोकांमुळे मी या  राजकारणापासून बचावलो. 

—————————————–

Author

Leave a Reply