अंतर्नाद नव्या माध्यमात प्रकाशित होत आहे ही घटना खूप आश्वासक आहे.
मुखपृष्ठापासून ते विषयवैविध्य व त्यांची गांभीर्यपूर्ण हाताळणी उल्लेखनीय व अंतर्नादची भावी दिशा दाखवणारी आहे. वाचकांचा प्रतिसाद व सूचना यांनुसार त्यात आवश्यक बदल वेळोवेळी होतील ही खात्री आहे. छापील अंतर्नादचा प्रवास थांबवताना भानू काळे यांना किती मानसिक त्रास झाला असेल याची कल्पना आहे. एक संपादक व लेखक म्हणून अंतर्नादच्या प्रवासात गुंतत जाताना त्यांना किती आनंद मिळाला असेल, तेवढेच दुःख व यातना त्यातून बाहेर पडताना झाल्या असतील. गेल्या काही वर्षांमध्ये कमी होत जाणारा वाचक वर्ग, दर्जा टिकवून ठेवण्यासाठी करावी लागणारी धडपड, हे चित्र खूप घाबरवणारं आहे. ‘बाईपण भारी देवा’ या गर्दी खेचणाऱ्या (लोकप्रिय ?) चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अंतर्नाद प्रकाशनाची घटना मला म्हणूनच खूप आश्वासक वाटते. ऑगस्ट अंक खूप वाचनीय आहे. त्यातही गुरुगोविंदसिंह यांच्यावरील लेख व ‘विक्रम वेताळ व संपादक’ हे विशेष संपादकीय आवडले.
शैला मुकुंद
पुणे

अन्तर्नाद फिनिक्स चे उड्डाण स्वागतार्ह आहे.
कॅप्टन संजय सहस्रबुद्धे, दर्यावर्दी.
भानू काळे यांच्या ‘सांस्कृतिक समृद्धीसाठी’ सुरू केलेल्या ‘अंतर्नाद’ या साहित्यविषयक मासिकाचे डॉ. अनिल जोशी यांच्या सक्रिय सहभागातून इंटरनेट आवृत्तीच्या स्वरूपातून पुनरूज्जीवन झाले आहे याबद्दल आम्हा रसिकांना या दर्जेदार मासिकाच्या माध्यमातून आनंद मिळवून देण्यासाठी केलेल्या या प्रयोगाला मन:पूर्वक शुभेच्छा.
सुहास पाटील, उत्तूर (जि. कोल्हापूर)